फौजदारी (Criminal) प्रकरणांमध्ये जामीन प्रक्रिया
How to obtain bail
भारतीय राज्य घटनेत जीवन जगण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे.
भारतीय राज्य घटनेत जीवन जगण्याचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे.. वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे विवादांचे प्रमाणही समाजात वाढले आहे. सततच्या विवादांमुळे ताण-तणाव निर्माण होवून कळत नकळत गुन्हा घडतो. घडलेल्या गुन्हयामध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. कारण नसताना एखाद्या गुन्ह्यात नाव गोवल्याने न्यायालयात सुटकेसाठी जामीनदाराचा शोध घ्यावा लागतो. पोलिस स्टेशनमध्ये दखलपात्र व अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जामीन मंजूर करावयाचे की नाही हे न्यायालय ठरवते.
दखलपात्र : यात दोन प्रकार आहेत - 1)जामीनपात्र 2) अजामीनपात्र. जामीनपात्र गुन्ह्यात जामीन मिळवणे हा अधिकार असून अजामीनपात्र गुन्ह्यात आरोपीस जामीन देण्याचा अधिकार पुलीसांना नसतो. अजामीनपात्र गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयासमोर हजर केले जाते. न्यायालय घटलेल्या गु्न्ह्याच्या बाबींवर विचार करून जामीन देण्यासंबंधी न्यायनिर्णय देते. यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे सत्र न्यायालयासमोर (Session Court) तर इतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिक (Judicial Magistrate) यांचे समोर चालतात. Session Court समोरील प्रकरणात Judicial Magistrate यांना जामीन देण्याचा अधिकार नाही. उदा. खून. अपवादात्मक स्थितीत खालचे न्यायालय स्त्रिया, लहान मुले, अपंग व्यक्ती आदींसंबंधी यांना जामीन देण्याचा विचार करु शकते.
जामीन देताना संबंधित व्यक्ती पलायण करुन जाणार नाही, साक्षीदारावर कोणत्याही प्रकारे दबाव आणणार नाही, वेळचेवेळी प्रत्येक सुनावणीसाठी मेहेरबान कोर्टात हजर राहील आदींचा विचार केला जातो.
जामीन कशी होऊ शकते: योग्य जामीनदाराकडे मेहेरबान कोर्टाने मागितलेल्या security bondच्या रकमेइतकी स्थावर जंगम मालमत्ता किंवा उत्पन्नाचा स्त्रोत असणे जरुरीचे आहे. मालमत्तेच्या कागदपत्रात प्रामुख्याने शेतजमिनीचा सातबारा, प्लॉट किंवा घराचे पी. आर. कार्ड व उत्पन्नाचा स्त्रोत मध्ये पगार पत्रक असणे गरजेचे आहे. स्थावर जंगम मालमत्ता संबंधित न्यायालयाच्या न्यायकक्षेत असावी अशी अट नसून देशाच्या कुठल्याही भागात असली तरी त्यास जामीनदार होता येते. अशी व्यक्ती देशाच्या कुठल्याही न्यायालयात जामीनदार राहू शकते. जामीनदार स्वत: संबंधित प्रकरणात आरोपी नसावा तसेच त्याने कुठल्याही प्रकरणात सहा महिन्यांपूर्वी जामीन घेतलेली नसावी.
अटकपूर्व जामीन : अजामीनपात्र गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीस जामीन मागण्याचा अधिकार आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रकार कित्येकदा घडतात. अशाने पिडीत व्यक्तीचे समाजातील मान मर्यादा मलिन होऊ शकते. याविरुद्ध भारतीय प्रक्रिया संहिता 438 नुसार सत्र न्यायालय (Session court)अथवा उच्च न्यायालय (High Court) यांचेकडे दाद मागता येते.
व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क - गुन्हेगार नसलेली व्यक्ती कायद्याचे पालन करून स्वतः निर्दोष असल्याचे सिद्ध करू शकत असेल तर राज्य घटनेने त्यास मुक्त संचार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा मुलभुत हक्क दिलेला आहे. त्याने केलेल्या कथित गुन्ह्याचे गांभीर्य व त्याच्या विरूद्ध उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर त्याच्या जामिनाचा विचार संबंधित न्यायालय करते. एकदा जामीन नामंजूर केल्यानंतरही परिस्थितीच्या बदलानुसार कितीही वेळा जामीन अर्ज करता येतो.
जामीनकरणेकामी लागणारी कागदपत्रे -
1) रेशन कार्ड 2)आधार कार्ड 3)मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट. 4) काही न्यायाधीश मूळ आरसी बुकवर किंवा वाहन मालमत्तेची कागदपत्रे दाखवण्यासाठी आग्रह धरतील 5) काही न्यायाधीश सरकारी कामगारांना जामीन म्हणून उभे राहण्याचा आग्रह धरू शकतात
Written By Adv. Sarika Khude
(Rajgurunagar, Pune)
.